मुंबई भाजपमध्ये अध्यक्ष हटवण्याच्या जोरदार हालचाली?

मुंबई |  राज्यात विधानसभा निवडणूक झाल्यानंतर सत्तासमीकरणांमध्ये अमुलाग्र बदल झाला. भाजपच्या एकेकाळच्या मित्राने म्हणजे शिवसेनेने काडीमोड घेत काँग्रेस राष्ट्रवादीशी सलगी केली. या सगळ्यांमुळे 105 आमदार असूनही भाजप बॅकफूटला गेल्याचं चित्र आहे. अशातच मुंबई महानगरपालिका जवळ येतीये. त्यामुळे शिवसेनेला रोखण्यासाठी भाजपने मराठी चेहऱ्याचा शोध घ्यायला सुरूवात केली आहे. साहजिकच यामुळे मुंबई भाजपाध्यक्षपदी असलेल्या मंगलप्रभात लोढा यांची पदावरून गच्छंती होण्याची शक्यता आहे.

लोढा हे प्रसिद्ध बिल्डर आहेत. त्यामुळे शिवसेनेशी दोन हात करताना त्यांना काही मर्यादा येणार आहेत. लोढा यांनी जर शिवसेनेला शिंगावर घेतलं तर त्यांचे सुरू असलेले प्रकल्प राज्य सरकार म्हणजे शिवसेना थांबवू शकते, असं भाजपच्या एका नेत्याने खासगीत बोलताना सांगितलं आहे.

मंगलप्रभात लोढा यांची जेव्हा मुंबईच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती तेव्हा आमच्या मनातही आले नव्हते की शिवसेनेची आणि आमची युती तुटेल. पण आता मुंबई महानगरपालिका निवडणूक तोंडावर आल्याने शिवसेनेला अंगावर घेण्यासाठी आक्रमक आणि मराठी चेहऱ्याची आवश्यकता आहे आणि त्याचाच शोध सध्या सुरू आहे, असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, मुंबई अध्यक्षपदी कांदिवलीचे आमदार अतुल भातखळकर, विले पार्लेचे आमदार पराग अलवानी आणि अंधेरी पश्चिमचे आमदार अमित साटम यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-दिल्लीप्रमाणे आता महाराष्ट्रातही मोफत वीज!

-“भाजपचे अनेक माजी मंत्री शिवसेनेत जाण्याच्या तयारीत आहेत”

-दिल्ली नंतर भाजपचं महाराष्ट्रात ‘मिशन कमळ’?

-केजरीवाल सरकारचं ‘दिल्ली मॉडेल’ इतर राज्यांत राबवा; शिवसेनेचा नरेंद्र मोदींना सल्ला

-आम्ही कधी एकमेकांवर कंबरेखालचे वार केले नाहीत; आव्हाडांचे भाजपवर टीकास्त्र